मंगळवार 22 मे 2012

व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण!

मनुष्य ही परमेश्‍वराची जगातील सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितले आहे की, मानवी जीवन दुर्लभ आहे. आपल्याला मिळालेले मानवी जीवन ईश्‍वरी कृपा आणि अनेक पूर्वजन्मांतील आपल्या सत्कृत्यांचा परिणाम आहे. बाल्यावस्थेत माता-पिता त्याचे योग्य प्रकारे पालनपोषण करतात. त्याला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करतात व योग्य संस्कारही देतात. त्याचे योग्य वय झाल्यानंतर त्याला शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवतात. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला तेथे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मूर्ती दगडात लपलेली असते. शिल्पकाराला ती दिसते आणि निरुपयोगी भाग दूर करून तो आपल्याला सुंदर रूप दाखवतो. याच संदर्भात ‘शिक्षण’ या शब्दाची फोड करताना एक मान्यवर वक्ते म्हणाले, मूळ शब्द ‘एज्युस’ म्हणजे बाहेर काढणे असा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जे गुण, जी पात्रता, कौशल्य असते व ते प्रकट होण्यास, त्याबद्दलची जाणीव होण्यास मदत करते ते शिक्षण. शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. राष्ट्रीय वृत्ती व राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व यांची वाढ करणे, व्यक्तींमध्ये मूल्यांक संस्कार घडवणे, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तीन्ही स्तरांतून मूल्यांच्या संस्कारांची प्रक्रिया पूर्ण होईल हे पाहात ही मूल्ये विद्यार्थ्यांनी स्वीकारावीत अशा प्रकारची परिस्थिती, वातावरण निर्माण करणे हे शिक्षणात अभिप्रेत आहे.
वाचन आणि लेखनाइतकाच शिक्षणाचा मर्यादित अर्थ नाही. सामाजिक कार्यातील अनुभवातून मिळणारे शिक्षणही खूपच मोलाचे आहे. ज्ञान ही संपत्ती खरी, पण ती वापरली तरच तिचा उपयोग. शाळेतील शिक्षकाने मुलांची मने फुलवणे, मनोरंजनातून त्यांच्यावर सुसंस्कार करणे, त्यांच्या जीवनाला चांगले वळण लावणे, तसेच मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशाची भावी पिढी घडवणे ही शिक्षकाची जबाबदारी शिक्षकी पेशातील लोकांनी जोपासायला हवी. शिक्षक जर बालक होऊ शकत नसेल, तर तो योग्य प्रकारे शिक्षण देत नाही असेच समजले पाहिजे, असे आचार्य विनोबा भावे यांचे विचार होते. जगातला सर्वांत मोठा मान सेवा आणि त्याग या दोन गोष्टींमुळेच प्राप्त होतो. शिक्षक हा शिक्षणक्षेत्रातील प्रमुख घटक असून चांगली वर्तणूक, चांगल्या सुविधा, पोषक वातावरण, समता व ममतेच्या भावनेने विद्यार्थ्यांच्या मनाचे संवर्धन करणे हे शिक्षकाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे.
शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे, ज्ञान मिळवणे असा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान मिळवण्याची इच्छा निर्माण करणे हा आहे. माणसाची मनोवृत्ती बदलल्यास ज्ञानाचा उपयोग होतो. शिक्षणामुळे मनावर चांगले संस्कार घडतात आणि मनुष्य सुसंस्कृत होतो. समाजात माणुसकीने कसे वागावे याचे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. आपण जे ज्ञानग्रहण करतो, ते आपल्याला बोलता, लिहिता व वाचता आणि इतरांना पटवता आले पाहिजे. विद्या म्हणजे साचलेल्या पाण्याचे डबके नव्हे, तर सतत वाहणारी भागिरथी आहे. मानवी जीवनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, म्हणून चांगली पुस्तके सतत वाचणे आवश्यक आहे. शरीराच्या पंचेंद्रियांचा म्हणजे हात, पाय, डोळे, कान, नाक आदी इंद्रियांचा योग्य उपयोग करून शिक्षणाला वळण दिले की बुद्धीचा खराखुरा विकास होत असतो. मन, बुद्धी आणि शरीर या तीन्ही गोष्टींवर संस्कार करावे लागतात. मनाला संयमाचे, बुद्धीला विवेकाचे आणि शरीराला नियमांचे संस्कार करावे लागतात.
वाचनाने माणसाच्या विचारांना प्रगल्भता येते, म्हणून वाचन ही ज्ञानसाधना आहे. या ज्ञानगंगेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. प्रत्येकाने जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करणे आवश्यक आहे. ज्ञानी व्यक्तीपाशी नैतिकतेचा अभाव असेल तर ती समाजाला आणि स्वतःलाही उपयोगी ठरणार नाही. म्हणूनच मूल्यांवर आधारीत जीवन उभारणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चांगल्या संस्कारासाठी चांगली पुस्तके वाचणे आवश्यक आहे. शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास अध्ययनाच्या किमान पातळीपर्यंत आणणे, अध्ययन सचेतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, ही भूमिका आज शिक्षकाला पार पाडायची आहे. मुलांना शिक्षण देण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे. त्यांना चांगल्या सवयी लावणे, अनुकूल वातावरण निर्माण करणे व प्रतिकूल गोष्टी दूर करणे. शैक्षणिक विकासात समाजाच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. जास्तीत जास्त समाजाला शिक्षण कसे देता येईल याचा शिक्षकांनी आणि पालकांनी विचार करावा. त्यासाठी पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

शनिवार 12 मे 2012

पाणी वाचवाऽ पाणी वाचवाऽऽ

पाणी हा माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्यावर या सृष्टीचे चक्र फिरत आहे, आपण पाण्याशिवाय पृथ्वीची कल्पनाही करू शकत नाही. सद्यस्थितीत पाणी वाचवणे अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्यामोठ्या खेड्यातील हाल पाहायलाच नकोत. तिथे तर टँकरने पाणी आणलेलेही पुरत नाही. ही टंचाई दूर करण्याचे काम जरी सरकार करत असेल, तरी आपलेही काही कर्तव्य आहे की नाही. आपण पाणी कुठे वाया घालवतो त्याचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. आपली उपनिषधे सांगतात, दुसर्‍याचे काहीही घेऊ नये, कारण ही सृष्टी परमेश्वराच्या मालकीची आहे आणि आपण आपल्या गरजेइतकाच भाग घ्यावा. कारण या जगातील सर्व गोष्टी सर्वांसाठी आहेत. निसर्गाची नासाडी थांबवणे आता आपल्या हातात आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे, त्या तापमानवाढीला आपण हातभार न लावलेला बरा!

आपण आपल्या दैनंदिन जीवनातही थोडा विचार करून, योग्य नियोजन करून, पाण्याचा दुरुपयोग टाळू शकतो. नळाखाली भांडे भरताना त्यातून पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हॉटेल्स, रेस्टॉरंट यासारख्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी जर छोटे ग्लास वापरले, तर पाण्यामध्ये बरीच बचत होऊ शकते. बहुतेक वेळा मोठ्या ग्लासमधील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी फेकूनच दिले जाते. बंगल्यामध्ये, सोसायटीमध्ये गच्चीवर ठेवलेल्या टाक्यांमध्ये खाली साठवणीच्या टाकीमधील पाणी पंपाद्वारे वर चढविले जाते. आता एका विशिष्ट पातळीपर्यंत टाकीत पाणी भरले की पंप आपोआप बंद होईल अशी यंत्रणा उपलब्ध आहे. तशी व्यवस्था नसेल तर टाकी भरल्यानंतर जादा पाणी बाहेर पडण्यासाठी पाईप बसवला तर टाकी भरली हे समजल्याबरोबर पंप लगेच बंद करू शकतो. बर्‍याच वेळा आपल्या घरातील नळ थेंब थेंब गळत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु अशा गळतीमुळे २४ तासांत सुमारे ४-५ लिटर पाणी वाया जाते. अशा छोट्या कामासाठी प्लंबर मिळत नाही. त्यामुळे स्वतःच वॉशर बदलण्याचे किंवा नळदुरुस्तीचे काम शिकून घ्यावे.
पाणी बचतीच्या चळवळीतून एखादे राष्ट्र केवढी मोठी प्रगती करू शकते, हे इस्त्रायल देशाने दाखवून दिले आहे. तिथे वर्षभरात फक्त पाच ते १० इंच पाऊस पडतो (कोकणात जुलै महिन्यात अनेक वेळा पाच इंच पाऊस एका दिवसात पडतो) असे असूनही त्या देशाने औद्योगिक व कृषिक्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली आहे. तेथील १०० टक्के शेती ही सूक्ष्म सिंचनावर आधारित असल्याने प्रत्येक पाण्याचा थेंब हा थेट वनस्पतीच्या मुळाजवळ जातो. आपल्या पद्धतीत आपण झाडापेक्षा मातीलाच पाणी देतो. त्यात पाण्याचा नाश तर होतोच; परंतु वनस्पतीला आवश्यक असणारी खतातून दिलेली अन्नदव्येही पाण्याबरोबर वाहून जातात. आज आपल्याकडे इस्त्रायलसारखी पावसाची परिस्थिती नसली, तरी अमर्याद वाढणारी लोकसंख्या व पाण्याचा बेछूट वापर यामुळे पाण्याची टंचाई थोड्याच दिवसांत भासू लागेल. म्हणूनच जनसामान्यांमध्ये पाणीबचतीचे चळवळीत रूपांतर झाले पाहिजे; तरच येणार्‍या पाणीटंचाईवर आपण मात करू शकू.

गुरुवार 3 मे 2012

पुन्हा एकदा 'जंगल सत्याग्रह'!

निसर्ग हा जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पृथ्वीवर तो असल्यामुळेच येथे जीवसृष्टी आहे. अन्य ग्रहांवर निसर्ग, पाणी नाही म्हणूनच जीवसृष्टी नाही. सध्यस्थितीत पृथ्वीवरही मानवाच्या प्रगतीमुळे निसर्गाची अधोगती सुरू आहे. मानवाच्या निसर्गावर मात करण्याच्या हव्यासापोटी जंगल, नद्या, नाले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक तापमानातही झपाट्याने वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा सर्व जगभरात दिला जात आहे. तरीही मानवाची प्रगती(?) थांबत नाही. लोकसंख्या वाढीमुळे जंगल नष्ट करून तिथे वस्ती केली जात आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी मनुष्यवस्तीत शिरत आहेत. त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही त्यामुळे ते मनुष्यवस्तीतील पाळीव प्राण्यांना आपली भूक भागविण्यासाठी उचलून नेत आहेत. उन्हाळ्यात लागणार्‍या(?) वणव्यांमुळे अनेक वन्यप्राणी होरपळून मरत आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी अभयारण्ये उभारली जात आहेत, पण तीही अपुरी पडत आहेत. मानवाची प्रगतीची घोडदौड वन्यप्राण्यांसाठी मात्र जीवघेणी ठरत आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत जंगल वाचविण्यासाठी ‘जंगल सत्याग्रह’ झाला होता. आज उलटी गिणती चालू आहे. जंगल हटाव मोहीम अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. जंगल हटवून त्या ठिकाणी नागरी वस्ती वसवली जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. त्याबदल्यात पुरेशा प्रमाणात नवीन झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे ऋतुचक्र बदलत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा त्रास प्राण्यांबरोबर मानवालाही भोगावा लागत आहे, तरीही शहाणपण येईल तो मनुष्यप्राणी कसला? मानवाची जंगलतोड जोरदारपणे सुरूच आहे. प्रगती सकारात्मक असावी असे म्हटले जाते, पण मानवाच्या बाबतीत ते उलट होत आहे. मानवाचे प्रत्येक प्रगतीचे पाऊल हे निसर्गाला हानिकारक ठरत आहे. सध्या प्लास्टिकची समस्या मानवाला आणि निसर्गालाही मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने तर ही समस्या आणखीनच भयावह झाली आहे, तरीही आपल्याला जाग येत नाही.
जंगलांच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. एकंदर जमिनीच्या ३० टक्के भाग हा जंगलाने व्यापला आहे, मात्र गेल्या काही वर्षांचा अनुभव असे सांगतो की दरवर्षी ६० लाख हेक्टर जमिनीवरील जंगल नाहीसे होत आहे. जंगल कमी होत असल्यामुळे त्यावर आधारित उद्योगांवरही आता संक्रांत येऊ लागली आहे. आफ्रीका खंडात अजूनही शेती आणि वन्यजीवन याला बरेच महत्त्व आहे. हा अपवाद सोडला तर इतर ठिकाणी जंगलांचे क्षेत्र संकोचत जातेय, असा अनुभव येत आहे. पूर्वी जंगली प्राणी व अन्य जनावरे मानवी वस्तीत दिसणे हा केवळ योगायोगच मानला जायचा. सुटीच्या दिवसात आणि सहलीच्या निमित्ताने वन्यप्राणी पाहण्याचा आनंद जंगली सफरीतून लोक लुटत होते, परंतु गेल्या आठ-दहा वर्षांत हे चित्र पूर्णतः पालटले आहे. आता या जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलात जाण्याची गरजच राहिली नाही, तर हे प्राणीच चक्क मानवी वस्तीत बिनधास्तपणे संचार करीत असल्याचे दिसून येतात. सिमेंट कॉंक्रीटची टोलेजंग जंगले उभारण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केल्याने जंगलातील पशू-पक्षी निवारा आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. विविध ठिकाणी वन्यप्राणी गावात शिरल्याच्या बातम्या आपल्या नेहमी वाचनात येतच असतात.
याचा अर्थ माणसाने प्रगतीच करू नये असा नाही. प्रगती ही झालीच पाहिजे, पण ती निसर्गाला पुरक असावी. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचू नये. सिमेंटची जंगले उभारत असताना तोडली जाणारी झाडे पुन्हा त्याच संख्येत लावली गेली पाहिजेत. झाडांची संख्या कमी होता कामा नये. सध्या अस्तित्वात असणारी जंगले तोडली जाऊ नयेत. जंगलांची संख्या कमी झाल्यास तेथील रहिवासी (वन्यप्राणी) नागरी वस्तीत घुसतील आणि त्यामुळे माणसाला होणारा त्रास भयानक असेल. त्याची काही प्रमाणात सुरुवात झालीही आहे. माणसाने लवकरात लवकर आपली वर्तणूक सुधाराली पाहिजे अन्यथा वन्यप्राण्यांचा ‘जंगल सत्याग्रह’ सुरू होईल आणि तो माणसाप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने नसून हिंसेच्या मार्गाने असेल, हे वेगळे सांगायला नको...!

शुक्रवार 20 एप्रिल 2012

...अजून किती दिवस पोसायचे?

कसाबच्या सुरक्षेवर २५ कोटींचा खर्च झाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर १० दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यातील नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालून कसाबला जिवंत पकडण्यात आपल्या पोलीस दलाला यश आले, पण त्यासाठी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले. अतिरेक्यांशी लढताना करकरे, साळसकर, कामटे यांसारख्या पोलीस अधिकार्‍यांना, तर कसाबला पकडताना कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. इतकी मोठी किंमत आपण या हल्ल्याच्या वेळी चुकवली आहे. अन्य नुकसानही आहेच. इतके होऊनही कसाबला आपण पोसतोच आहोत.
खरं म्हणजे आता हल्ला होऊन साडेतीन वर्षे होऊन गेली आहेत. आतापर्यंत कसाब फासावर लटकायला हवा होता, पण तो अजूनही सरकारी पाहुणचार झोडतोच आहे. सर्वसामान्य नागरिक अजूनही त्याच्या फाशीची अतुरतेने वाट पाहत आहेत. त्याला फाशी दिल्याशिवाय भारतीयांना समाधान लाभणार नाही आणि अतिरेक्यांना जरबही बसणार नाही. त्यामुळे कसाबला लवकरात लवकर फाशी देणे हे आता गरजेचेच नाही तर आवश्यकही झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर विचार करता, संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू अजूनही फाशीची वाट पाहतो आहे. त्याला फाशीची सुनावणी होऊन प्रदीर्घ काळ लोटला, तरीही त्याच्या फाशीची अंमलबजावणी अजूनही होतेच आहे. संसदेसारख्या देशाच्या मानबिंदूवर ज्याने हल्ला केला व देशाचे नाक कापले त्याला फाशी देण्यासाठी आपल्या प्रशासन यंत्रणेला का वेळ लागतोय, हेच समजायला मार्ग नाही. अफजल गुरूची फाशी निश्‍चित होऊनही जर तीची अंमलबजावणी होऊ शकत नसेल, तर कसाबच्या फाशीची वाटच पाहावी लागेल.
गेली साडेतीन वर्षे कसाबचा आपल्या देशात पाहुणचार चालू आहे. त्याच्या सुरक्षेवर भरमसाठ खर्च होतो आहे. काही दिवसांपूर्वी आचार्‍यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. आता तर कसाबवरील एकूण खर्च २५ कोटींच्या घरात गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोर्टाचे काम लवकरात लवकर आटोपून कोर्टाने दिलेल्या निर्णयाला आपिलाचा पर्याय न ठेवता त्याच्या फाशीचा मार्ग मोकळा केला पाहिजे आणि यापुढील काळातही दहशतवाद्यांच्या शिक्षेला अपिलाचा पर्याय ठेवू नये. तरच दहशतवाद्यांना भारतीय कायद्याची जरब बसेल. या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा असे वाटते.

गुरुवार 12 एप्रिल 2012

पूर्णब्रह्म तरीही... सढळ हस्ते नासाडी

सध्या लग्नसराई असल्याने सगळीकडे लग्न समारंभांचा धुमधडाका उडाला आहे. त्यात पुढील मे महिन्यात मुहूर्त नसल्याने काहींना एकाच दिवसात दोन-दोन लग्नांना उपस्थित राहावे लागत आहे. आपल्या देशात लग्नघर म्हणजे गडबड-घाई. खरेदी, पाहुणे-रावळे याबरोबरच नवरा-नवरीची खास खरेदी, मेकअप या सर्व गोष्टी आल्याच. नवरा-नवरी तर लग्नाच्या निमित्ताने आपले सर्व हट्ट पूर्ण करून घेतात. घरातली मंडळीसुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता त्यांचे हट्ट पूर्ण करीत असतात. लग्न म्हणजे सर्वांसाठीच पर्वणी असते.
त्याचबरोबर लग्न म्हटले की जेवणावळीही आल्याच. कुणाच्या लग्नात काय काय पदार्थ होते त्याचे चर्वितचर्वण लग्नानंतरही काही दिवस सुरू असते. त्यामुळे जेवण हे लग्नकार्यातील प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. आग्रह करून वाढणे हा तर भारतीयांचा स्वभावधर्मच आहे. अगदी वाया गेले तरी चालेल, पण आग्रह हा होणारच. जेवण वाया जाऊ नये म्हणून काही ठिकाणी बुफे पद्धतीने जेवणावळी असतात, मात्र त्यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही, उलट पुन्हा रांग लावायला नको म्हणून एकदाच भरमसाठ वाढून घ्यायचे आणि पोटात जात नाही म्हणून ताटात उष्टे टाकून द्यायचे असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे दोन्ही प्रकारांत अन्न वाया जायचे तेवढे जातेच. अन्न वाया जाणे म्हणजे वाईटच, पण त्यासाठी जेवणावळी बंद करा असे सांगणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल. कारण ‘नवरा येतो नवरीसाठी आणि वर्‍हाड येते जेवणासाठी’ अशी आपल्याकडे म्हणच आहे. त्यातून लग्नकार्यातील जेवणावळीचे महत्त्व अधोरेखित होते.
लग्न समारंभांमध्ये जेवणावळी या हव्याच. त्या नसतील तर लग्न समारंभ अपुरा आहे, पण आत मंडपात पंचपक्वान्नांच्या जेवणावळी झडत असताना बाहेर अर्धपोटी माणसे अन्नासाठी दाहीदिशा करीत आहेत याची आठवण आत जेवणारांनी ठेवली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की अगदी ताटे भरून बाहेर आणून वाटावीत, पण जेवताना थोडे तारतम्य ठवावे. मी थोडे उष्टे टाकले तर काय मोठासा फरक पडणार आहे, असा विचार करत मंडपातल्या शेकडो लोकांनी थोडे थोडे उष्टे टाकले, तर त्यातून कित्येक लोक जेवतील इतके अन्न वाया जाईल. म्हणून आपण वाढून घेताना आपल्या पोटाचा अंदाज घेऊन वाढून घ्यावे. आपले वय पाहता आपल्या पोटाचा अंदाज आपल्याला असायलाच हवा. प्रत्येकाने ठरवले तर पंगत पद्धतीपेक्षा बुफे पद्धतीत अन्नबचत चांगल्या पद्धतीने होऊ शकते. कारण येथे जेवणारा हाच वाढून घेणारा असतो. त्याचबरोबर लहान मुलांना वाढून घेतानाही प्रमाणात वाढून घ्यावे किंवा अतिलहान असल्यास त्यांना आपल्या ताटातच जेवायला घ्यावे. त्यामुळे अन्न वाया जाण्याची शक्यता आणखी कमी करता येईल.
काही साध्या साध्या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्या, तर कितीतरी प्रश्‍न सहजगत्या सुटतील. त्यामुळे लग्नाला जाताना थोडा विचार करा, पोटभर जेवा पण ताटात उष्टे टाकू नका. सुधारणेची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी ना...